दोन महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंवर अधिकारी नाराज, प्रोटोकॉल पाळत नसल्याने त्रस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे
अधिकाऱ्यांतील खासगी चर्चेतून पुढे आलेली माहिती अशी की, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदी आल्यापासून त्यांनी कोणताही प्रोटोकॉल पाळलेला नाही, अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसंच नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभं राहावं लागतं.
शिवाय, दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे पोहोचत नाही. रात्री उशिरा बैठका, दौरे घेतात. त्यामुळे तो सगळा वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावं लागतं. राज्यातलं राजकारण सध्या तापलेलं असल्याने मुख्यमंत्री शिंदेंना कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र त्यांच्या सततच्या बदलत्या दिनक्रमामुळे अधिकारी वर्ग आता त्रासला आहे.