खऱ्या इतिहासाची मोडतोड केली जात आहे – आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
जेजुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चा
जेजुरी. दि.१९
जेजुरीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले.आता एक नवीन पध्दत आली आहे,कोणी उठायचं आणि आपला इतिहास कसाही तोडायचा-मोडायचा,एखादे वक्तव्य करायचं,सध्या ही फॅशन झाली आहे पण त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते.खरा इतिहास बाजूला ठेवल्यामुळे नंतर त्याचा उद्रेक होतो.जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत हसावं की डोकं फोडून घ्यावं हे समजेना,केवळ चर्चेत राहण्यासाठीच अशी वक्तव्य केली जातात.ही दुर्दैवाची गोष्ट आहे.हिंदू बांधवांमध्ये भीती निर्माण होऊ लागल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत.देव-देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी उभे राहिले पाहिजे.हिंदू धर्म कोणाच्या विरोधात नाही पण धर्माचे तुकडे करून त्यातून लव्ह जिहाद सारख्या घटना घडत असतील तर रस्त्यावर उतरलेच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व शिवशाहीतील पुढील राजे,सरदार मुघलांच्या विरोधात लढले पण त्यांनी दुसऱ्या धर्मा विरोधात काही केले नाही.मात्र अफजलखान व त्याच्या साथीदारांनी हिंदूंचे मंदिरे तोडून युद्ध केले.आपण आपल्या देवधर्माच्या रक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.लव्ह जिहाद,धर्मांतरण व गोहत्या या विरोधात कायद्यात बदल करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू.आपली एकजूट कायम ठेवा,चुकीच्या इतिहासाला बळी पडू नका,हिंदू समाजाची ताकद वाढली पाहिजे असे त्यांनी भाषणात सांगितले.
किल्ले संवर्धन समितीचे विक्रम पावसकर यांनी हिंदू समाजातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत आहेत.मुस्लिम व ख्रिश्चन धर्मियांकडून हिंदू धर्मीयांचे धर्मांतर होत आहे.या विरोधात सर्वांनी कडक भूमिका घ्यावी.मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करा.भारत हे हिंदू राष्ट्रच आहे आणि या हिंदू राष्ट्रात हिंदूंवर होणारा अन्याय सहन करणार नाही असे सांगितले.या सभेत हिंदू जनजागृतीच्या क्रांती पेटकर व दुर्गा वाहिनीच्या हर्षदा धुमाळ यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र ठकार यांनी केले.जेजुरीमध्ये केलेल्या या मोर्चासाठी तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव आले होते.पालखी मैदानापासून सुरू झालेला मोर्चा खंडोबा गडाच्यामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर तेथे सभा घेण्यात आली.सभेसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.राजाभाऊ चौधरी,सचिन पेशवे,गणेश भोसले, विठ्ठल सोनवणे, अलका शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.